औरंगाबादमध्ये गेल्या काही तासांत आणखी ५५ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ७४२ झाली असून मृतांची संख्या २० झाली आहे. अवघ्या काही तासांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण सापडल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये भीमनगरमध्ये १५, सातारा परिसर ८, उस्मानपुरा ७, संजय नगर – मुकुंदवाडी ३, आरटीओ परिसर, न्याय नगर आणि हुसेन कॉलनी प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. तर पाडेगाव, सिल्कमिल्क कॉलनी, कांचनवाडी, नारळीबाग, बन्सीलाल नगर, दत्त नगर, पुंडलिक नगर, गुरू नगर, गरम पाणी, नंदनवन कॉलनी, गारखेडा, शहनूरवाडी, पंचशील दरवाजा, बेगमपुरा आणि किलेअर्क येथे प्रत्येकी एक तर इतर ठिकाणी दोनजण सापडले आहेत. या सर्वांना संपर्कातून करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं. यातील काही रुग्णांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. यातील बरेचसे रुग्ण सौम्य ते अति सौम्य लक्षणे असलेली आहेत. या रुग्णांना इतरही आजार नाहीत ना? याचा तपास केला जात आहे. या सर्व रुग्णांना संपर्कातून करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं.तर, हुसेन कॉलनी येथील ५५ वर्षीय महिलेला १२ मे रोजी खासगी रुग्णालयातून घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधित महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता व तो पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संबंधित महिला ही करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान महिलेची प्रकृती खालावत गेल्याने आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला मधुमेह, उच्च रक्तदाब व हायपोथायरॉईडिझमने त्रस्त होती, असे घाटी प्रशासनाने सांगितले. आज या महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २० झाली आहे.
दरम्यान, या सर्व रुग्णांच्या संपर्कातील लोकांची यादी तयार करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात काल दिवसभरात ३४ करोना बाधित सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६८८ झाली होती. तसेच २४ तासांत ४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांचा मृतांचा आकडा १९वर पोहोचला होता.
Real news …best